[0:18]नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो माझा नोकरीनामा या मराठी YouTube चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा शासकीय कार्यालय टिपणी लेखन हा आहे. सदर व्हिडिओ हा अत्यंत माहितीपूर्ण असल्याने तो शेवटपर्यंत पाहत रहा.व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर आपण सदर चॅनलवर नवीन असाल तर अधिकाधिक उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरु करूया. टिपणी लेखन (NOTING) म्हणजे काय? सरकारी कार्यालयातून एखादे पत्र किंवा प्रकरण निकालात काढणे सोयीचे जावे म्हणून त्याविषयी संबंधित फाईलमध्ये आवश्यक त्या सूचना करण्यासाठी जे संक्षिप्त स्वरूपाचे समर्पक लेखन केले जाते त्याला टिपणी लेखन (NOTING) असे म्हणतात.
[1:06]सदरहू पत्र किंवा प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्याला त्या पत्राची किंवा प्रकरणाची पूर्वपीठिका माहित करून देणे तसेच विचाराधीन कागदपत्रात अंतर्भूत असलेल्या निरनिराळ्या मुद्दयांचा विचार करणे व प्रत्येक मुद्दयांसंबंधीची अनुकूल व प्रतिकूल बाजू मांडणे व आवश्यक ती कार्यवाही सुचवणे, हा टिपणीमागचा हेतू असतो. टिपणी लेखनाचे महत्व:- Important of Notting. प्रशासकीय लेखनाचे शासन व्यवहारात विशेष महत्त्व आहे.या प्रशासकीय लेखनाचे प्रामुख्याने पत्रव्यवहार व टिपणी लेखन असे दोन भाग पडतात. ह्या भागात आपण केवळ टिपणी लेखनाबाबतच माहिती पाहणार आहोत.टिपणी लेखन हा शासकीय कार्यालयातील म्हणजेच प्रशासकीय लेखनातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे तो कसा आहे ते आपण पाहुया. पहिली बाब म्हणजे, टिपणी लेखनामुळे संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांंना अर्जातील प्रकरणाची सुस्पष्ट कल्पना येते. ज्यामुळे त्याला निर्णय घेणे सुलभ होते तसेच त्याचा महत्त्वाचा वेळ सुद्धा वाचतो. दुसरी बाब म्हणजे, टिपणी लेखन हे प्रशासकीय नियमानुसार व लिखित स्वरूपात असल्याने त्यात व्यक्तिगत हितसंबंधांना स्थान नसते.त्यामुळे निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होते. तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, कार्यालयात काहीवेळा त्याच त्याच स्वरूपाची प्रकरणे येत असतात.तेव्हा सुद्धा मागील टिपणीचा संदर्भ म्हणून वापर केला जातो.टिपणी ही कायदेशीरदृष्ट्या पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरली जाते. टिपणी लेखनाचे प्रकार :- कार्यालयीन कामकाजाच्या स्वरूपानुसार, टिपणी लेखनाचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. 1.नित्याची टिपणी :- काही नेहमीच्या पत्रव्यवहाराबद्दल कोणत्यास्वरूपाचा निर्णय घ्यायचा आहे आधीच ठरलेले असते.त्यामुळे संबंधित लिपीक त्या पत्राची केवळ नोंद ठेवतो.उदाहरणार्थ, एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर तशी मागणी करणारा पत्र, स्मरणपत्र, विनंती अर्ज इत्यादीबद्दल लिहिलेली छोटी टिपणी कारण त्याचे महत्त्व हे तात्कालिक असतं, यांना नित्याची टिपणी असे म्हणतात. 2.माहितीपर टिपणी :-कार्यालयात आलेल्या काही पत्रांचे स्वरूप हे फक्त माहिती देणे इतकेच मर्यादित असते तसेच तो मजकूर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केवळ निदर्शनास आणून पाण्याचा असतो.लिपिकांना त्यासाठी माहितीपर टिपणी लिहावी लागते.त्यातील माहिती ही सहयाची असल्याने ती जपून ठेवली जाते. 3.कार्यवाहीची टिपणी :-एखाद्या प्रकरणाबद्दल निश्चित निर्णय घेण्याची जेव्हा गरज असते, त्यावेळी ही टिपणी लिहिली जात असते. ही टिपणी इतर टिपणीपेक्षा थोडी सविस्तर लिहिली जाते.कारण त्यात प्रकरणाची सविस्तर व इत्थंभूत माहिती लिहिणे आवश्यक असते.प्रकरणातील उपस्थित मुद्द्यांची तपासणी, ओहापोह यात केला गेलेला असतो.
[4:05]तसेच त्या प्रकरणातील मुद्दयाबाबत निर्णय घेताना संबंधित नियम, अधिनियम, पूर्वप्रकरणांचे संदर्भ इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्या लागतात.यात उपयुक्त सूचनादेखील अपेक्षित असतात.त्या टिपणामुळे संबंधित अधिकाऱ्यास निर्णय घेणे सुलभ होते. 4.पूरक टिपणी :-टिपणीत एखाद्या मुद्द्यासंबंधी अवांतर माहिती पुरवणे आवश्यक असूनही, ती त्यावेळी तिथे दिल्यास मूळ टिपणी पसरात होण्याची शक्यता असते.अशावेळी ही अवांतर माहिती देणारी जी स्वतंत्र टिपणी लिहिली जात असते तिला पूरक टिपणी असे म्हणतात.
[4:43]ही टिपणी मुख्य टिपणीला जोडली जाते.काही वेळा ही फाईलच्या तळाशी पूरक टिपणी अशी पताका लावली जाते.
[4:54]टिपणी लेखनातील मुद्दे : टिपणी लेखन करण्यापूर्वी लिपीकाने /सहाय्यकाने निकालात काढावयाचे पत्र व पत्रव्यवहाराची फाईल प्रथम काळजीपूर्वक वाचली पाहिजे.त्यातील महत्त्वाचे मुद्दे नोंदवीणे व त्या मुद्यांशी संबंधित माहिती गोळा करणे आवश्यक असते.
[5:14]त्यासाठी संबंधित शासननिर्णय, कायदे, नियमावली, परिपत्रके, पूर्वप्रकरणे व संकेत यांचा आधार घ्यावा लागतो.ज्या आधारे त्याने विचाराधीन प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीने उद्भवनारे प्रश्न किंवा मुद्दे ह्यासंबंधीची योग्य उत्तरे तयार केली पाहिजे. टिपणी लिहिताना आवश्यक मुद्दे सर्वसाधारणपणे खालीलप्रकारे परिच्छेदांच्या स्वरूपात लिहिणे अपेक्षित असते. परिच्छेद क्र.1 :-कार्यवाही करावयाच्या पत्रात समाविष्ट असलेल्या वस्तुस्थितीचे थोडक्यात विवरण अगदी मोजक्याच परंतु स्पष्ट शब्दात.
[5:48]परिच्छेद क्र.2 :-प्रकरणसंदर्भातील उपस्थित केलेल्या प्रश्नांचा त्यात समावेश असावा. परिच्छेद क्र.3 :-प्रकरणसंदर्भातील अनुकूल व प्रतिकूल मुद्दे यात मांडण्यात यावे.
[6:03]परिच्छेद क्र.4 :-पत्रात नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट असल्यास तिचा उल्लेख स्पष्टपणे लक्षात येईल अशास्वरूपात यात करावा. परिच्छेद क्र.5 :-प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व निष्कर्ष व निर्णय यांचा समावेश असावा. अशाप्रकारे टिपणीची परिच्छेदे लिहिलेली असावी व तीत सर्व मुद्दे समाविष्ट केलेले असावे तसेच ती थोडक्यात व मुद्देसूद असावी. टिपणी लेखनासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना : 1.कोणत्याही प्रकारचे टिपण हे मूळपत्रावर (Original letter) लिहू नये त्यासाठी कोणत्याही कागदाचा किंवा बफरशिटचा वापर करावा. 2.जर एकच प्रकरणामध्ये अनेक बाबींसाठी वेगवेगळे स्वतंत्र आदेश काढण्याची गरज असल्यास त्यासाठी प्रत्येक बाबनिहाय वेगवेगळे टिपण लिहिणे आवश्यक असते. 3.नोटशीट ही प्रिंटेड नसल्यास साध्या कागदाचा उपयोग करीत असल्यास टिपणी लेखन करताना शिरोभागी उजव्या कोपऱ्यात विभागाचे नाव व शाखेचे नाव (संक्षिप्त स्वरूपात) लिहावे. 4.टिपणीतील प्रत्येक परिच्छेदांना क्रमांक देण्यात यावा.फाईलमधील विशिष्ट कागदपत्रांचा निर्देश करण्याची आवश्यकता असल्यास, त्या कागदपत्रांचा उल्लेख करावा व त्या कागदपत्रांवर पताका लावून ठेवावी.त्यामुळे अधिकाऱ्यांंना आवश्यक वाटल्यास ते कागदपत्र लवकर मिळणे शक्य होईल. 5.एखाद्या फाईलवर आधीच्या टिपणीत जर संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली असेल तर ती पुन्हा लिहिण्याची गरज नसते.मात्र सुरुवातीला अगोदरच्या टिपणीचा संदर्भ नोंदवावा लागतो. 6.जेव्हा एखाद्या टिपणीवरच टिपणी लिहिण्याची वेळ येते, तेव्हा मूळ टिपणीशी सहमत असल्यास पुन्हा स्वतंत्र टिपणी लिहिण्याची गरज नसते.केवळ स्वाक्षरी केली तरी चालते.परंतु एखाद्या मुद्द्याबद्दल काही वेगळा अभिप्राय असेल तर तेवढाच नोंदवावा आणि स्वाक्षरी करावी. 7.टिपणीच्या अखेरीस डाव्या बाजूला टिपणी लेखकाने आपल्या नावाची आद्याक्षरे व दिनांक नोंदवावा.त्यानंतर टिपणी ज्या अधिकाऱ्यांकडे सादर करावयाची आहे त्या अधिकाऱ्यांचा हुद्दा संक्षेपाने लिहावा.एकापेक्षा अनेक अधिकाऱ्यांंना टिपणी सादर करावयाची असेल तर त्यांचे हुद्दे चढत्याक्रमाने लिहावे. 8.टिपणीची भाषा सोपी व आकलनास सुलभ अशी असावी.टिपणी शक्यतोवर संक्षिप्त, सुटसुटीत व काटेकोर मुद्द्यांशी संबंधित असावी.लेखन तटस्थपणे करावे, त्यात व्यक्तिगत हितसंबंधांना थारा नसावा, स्तुती, निंदा व दोषारोप टाळावे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपले व्हॅल्यूएबल कमेंट कमेंट बॉक्समध्ये खाली द्या आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.धन्यवाद.



